Maharashtra Politics : राज्यातील राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत करणे आणि महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आज (ता. 11) बैठकीत चर्चा करण्यात आली. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.राज्यातील महिला जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांची आणि अल्पसंख्याक सेल व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत आज प्रदेश कार्यालयात पार पडली.
आढावा बैठक
राज्यसरकारकडून महिलांच्या सशक्तीकरणासाठी, उन्नतीसाठी ज्या – ज्या योजना अपेक्षित आहेत त्याचा आढावा दोन – चार दिवसांत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पात भरीव मागणी केली जाणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचीही बैठक झाली. प्रवक्ते पक्षाची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत असतात. लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या विषयावर सखोल चर्चा झाली. त्याचबरोबर सोशल मीडियाची बैठक घेतली. त्यानंतर अल्पसंख्याक सेलच्या विभागाचीही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यांचीही मते जाणून घेतली.
शाहू – फुले – आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन अनेक वर्षे वाटचाल करत आलो. त्याच विचारधारेवर वाटचाल करत असतानाच अल्पसंख्याक समाजाच्या भावना समजून घेतल्या. पुढच्या आठवड्यातही आमच्या पक्षाचे जे सेल आहेत, त्यांच्याही बैठका घेणार आहोत, असेही तटकरे म्हणाले.दरम्यान अधिवेशन संपल्यावर राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. चार वेळा पवारसाहेबांनी अजित पवारांना वेडं बनवलं.
पाचव्या वेळी सोडून दिलं. म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती, या विषयावर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पवार साहेबांसमोर जाहीर भाषण करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, असा थेट आरोप सुनील तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला.