महाराष्ट्र

BJP Politics : बच्चू कडू यांच्या प्रहारला भाजपचा मोठा धक्का!

Assembly Elections : प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. चार तारखेला मोठा बॉम्ब फोडू असा दावा करणाऱ्या बच्चू कडू यांनाच मोठा धक्का भाजपने दिला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईत 26 ऑक्टोबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनिल गावंडे यांनी प्रहारला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विदर्भात बच्चू कडू यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. त्यामुळे जागावाटप आणि उमेदवार जाहीर होत आहेत. अशातच प्रमुख पक्षाची उमेदवारी साठी इच्छुक असलेल्याना तिकीट न मिळाल्याने नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. त्यामुळे बंडखोरीलाही मोठा ऊत आला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

चुरशीची निवडणूक

राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन महाशक्ती आघाडीने आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवत विधानसभा निवडणुक अधिक चुरशीची केली आहे. दरम्यान अशातच बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे भाजपच्या गळाला लागले आहेत.

प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रहार आणि बच्चू कडू यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांना भाजपने जोरदार धक्का दिल्याचे बोलेले जात आहे.

Nitin Gadkari : तुमच्या बसेस राजकीय कार्यकर्त्यांना देऊ नका

अनिल गावंडे हे अकोट मतदारसंघासाठी प्रहार कडून इच्छुक होते. मात्र अकोट मध्ये परिवर्तन महाशक्ती कडून शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे अनिल गावंडे यांनी प्रहारची साथ सोडल्याचे बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल गावंडे हे अकोट मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते.

त्यांना तिसऱ्या नंबरची मते मिळाली होती. अपक्ष निवडणूक लढणाऱ्या अनिल गावंडे यांना अनिल गावंडे 28 हजार 183 मते मिळाली होती. दरम्यान त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला होता. त्यांना बच्चू कडू यांनी मोठी जबाबदारी दिली होती. मात्र अकोट मध्ये उमेदवारी न मिळालेल्या अनिल गावंडे यांनी अखेर बच्चू कडू यांची साथ सोडत भाजपला जवळ केले आहे.

दरम्यान अकोट विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे हे आहेत. अद्यापही या मतदारसंघाची भाजपची उमेदवार जाहीर झाली नाही. तर दुसरीकडे अनिल गावंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचं तिकीट कापले जातं का अशी चर्चाही यानिमित्ताने होऊ लागली आहे.

error: Content is protected !!