महाराष्ट्र

Supreme Court : संजय राऊत म्हणाले, “ये अंधा कानून है”!

Sanjay Raut : ‘सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे’; वादग्रस्त विधानामुळे खळबळ

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यांनतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयात आमदार अपात्रेबाबत अंतिम निकाल आलेला नाही. मात्र, निकाल लागण्यास दिरंगाई होत असल्याने ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट न्यायालयावर आगपाखड केली आहे. ‘तीन वर्षे झालीत, न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावायला पाहिजे. न्यायाधीश सांगतात हे सरकार घटनाबाह्य आहे. मात्र निकाल देत नाही. ये अंधा कानून है. आता ‘अंधा कानून’चे डोळे काढण्याची वेळ आली आहे,’ असे वादग्रस्त विधान करून राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

न्यायालयाबद्दल त्यांनी केलेल्या विधानामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे मेळावे आणि नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे शिवसेनेच्या शिव संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संजय राऊतांनी महायुती सरकार, मोदी सरकार आणि न्यायालयावरही हल्लाबोल केला. शिवसेनेतील फुटीनंतर 40 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात न्यायलयीन लढा सुरू आहे. अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. याबद्दल संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. न्यायालयाकडून या प्रकरणावर अंतिम सुनावणीसाठीही सातत्याने पुढची तारीख मिळत आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 शिवसेना आमदारांनी महायुतीसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह व 40 आमदारांच्या अपात्रेबाबत न्यायालयीन लढाई सुरू केली. मात्र, या दोन्ही निर्णयावर अद्यापही सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली नाही. त्यामुळे, न्यायालयाकडून होत असलेल्या विलंबावर उद्धव ठाकरे सातत्याने भाष्य करताना दिसून येतात. यामध्ये आता खासदार संजय राऊत यांनी थेट न्यायालयावर आगपाखड केली आहे.

‘तीन वर्षे झाली न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं लावायला पाहिजे. न्यायाधीश सांगतात हे सरकार घटनाबाह्य आहे. मात्र निकाल देत नाही. ये अंधा कानुन है. अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.

तर घटना जाळून टाकली असती

‘चारशे पार झाले असते तर यांनी घटना जाळून टाकली असती. पण, राज्याने त्यांना ब्रेक दिला. मराठी माणसाच्या नादी लागू नका, तो पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही. आता ठिणगी पडली आहे, त्याचा वणवा देशात पसरला आहे,’ असेही राऊत यांनी म्हटले. ‘आम्हाला तुरुंगात टाकले. आम्ही वाकलो नाही. जे पळून गेले त्यांनी शिवाजी महाराज यांचं नाव लावू नये ते कलंक आहेत. राज्यावर भांडवलदारांचे संकट आहे, रोजगार नाही. मुंबईची अवस्था भिकाऱ्यासारखी केली आहे. दुसरे मुंबई तिकडे उभे केले जात आहे,’ असे राऊत म्हणाले.

मोदी-शहा क्रुर व्यापारी

मोदी शहा हे नेते नाहीत, तर क्रूर व्यापारी आहेत. या राज्यात कोण सुखी आहेत? शेतकरी आत्महत्या करत आहेत, विद्यार्थी रस्त्यावर, महिला सुखी नाही, महागाई वाढली आहे. पंधराशे रुपये तोंडावर फेकले म्हणून कोणी सुखी होणार नाही. राज्य फक्त लुटण्यासाठी चालवत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!