New Dispute : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या घटनेमुळं महायुती सरकार धास्तवलेलं आहे. अशात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरून केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी राज्यभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाण्यात महात्मा फुले, शाहू, आंबेडकर प्रेमी रस्त्यावर उतरले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात हे विधान केले. इंग्रजांच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराज येथुन होऊन गेले. येथे देखील त्यांचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनीच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली. भागवतांच्या या वक्तव्यामुळे भ्रम निर्माण होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून विरोधक सक्रिय झाले आहेत.
अस्वस्थता
मोहन भागवतांच्या या विधानाने महात्मा फुले, शाहू, आंबेडकर प्रेमिंनामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात अशोक कलोरे, गजानन हाडोळे यांच्या नेतृत्वात राजू आसोलकार, जीवाजी शेगोकार, विलास मसने गुरुजी, दत्तात्रय संतोष पोटदुखे, योगेश पल्हाडे, आशिष गणगणे, ज्ञानदेव शेगोकार, रमेश हांडे, मोहन पिंपळे, डी.के. शेगोकार, संदीप गणोरकार, प्रशांत वाढोकार, संजय काठोळे, संभाजी नावकार, गजानन हाडोळे, दिनेश लहाने, शुभम लोखंडे, राजेश मसने, उमेश गणगणे, आशिष ठाकरे, प्रमोद मसने, राजेश काळने आदींनी आंदोलन केले.
तहसील कार्यलयावर पोहचून या सर्वांनी भगवंताच्या विरोधात निवेदन दिले. यांनतर रस्त्यावर येऊन भागवतांच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करीत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मोहन भागवत यांनाच प्रश्न विचारला. इतिहासाच्या कुठल्या पानावर लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधून काढली? रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढल्याबाबत इतिहासकारांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. त्यावेळी मनुवाद्यांनी फुले यांना त्रास दिला होता. आपण जे बोलतात त्याला आम्ही इतिहासाचं विकृतीकरण म्हणतो, असं आव्हाड म्हणाले.