महाराष्ट्र

Nitin Gadkari : ‘स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा कोसळला नसता’

Shivaji Maharaj statue : नितीन गडकरी यांचा दावा

Delhi : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. कधीही महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या प्रकरणावर मात्र स्पष्ट बोलले आहेत. स्टेनलेस स्टील वापरले असते तर पुतळा कधीच कोसळला नसता, असा दावा गडकरींनी केला आहे.

निष्काळजीपणा

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता. समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचे असते. कारण स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही, असही गडकरी यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. त्यामुळे भाजप सरकारविरोधात टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. तर शिवप्रेमींमध्येही संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील आरोप जयदीप आपटे फरार आहे.

विधान चर्चेत

या प्रकरणात केंद्रीय मंत्री गडकरी यांचं विधान चर्चेत आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. तो तयार करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर तो पुतळा पडला नसता, असा दावा गडकरी यांनी केला आहे. कारण समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम करताना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणे गरजेचं आहे, असंही गडकरी म्हणाले.

Farmers Issue : डॉ. शिंगणेंचा बैठकीतूनच धनंजय मुंडेंना फोन!

गडकरी नेमकं काय म्हणाले!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. ‘समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूलांसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात यावा, यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. मी मुंबईत जेव्हा 55 उड्डाणपूल बांधले तेव्हा एका माणसासोबत फेरफटका मारत होतो. त्याने मला उड्डाणपूलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडावर पावडर कोटिंग वापरण्यात आल्याचे दाखवले होते. या पावडर कोटिंगमुळे लोखंड गंजणार नाही, असा दावा त्याने केला होता. मात्र, काही दिवसांतच मुंबईतील उड्डाणपूलांसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडाला गंज लागले. त्यामुळे आता मला असे वाटते की, समुद्रकिनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात रस्त्यांचे बांधकाम करताना स्टेनलेस स्टीलचाच वापर करण्यात यावा. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतानाही स्टेनलेस स्टील वापरले असते तर हा पुतळा पडला नसता,’ असा दावाही नितीन गडकरी यांनी केला आहे.

अडीच कोटींचा पुतळा!

राजकोट किल्ल्यावर तब्बल 2 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यांतच कोसळला. भारतीय नौदलामार्फत राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या 28 फुटी ब्राँझच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. हा पुतळा जयदीप आपटे या शिल्पकाराने उभारला होता. या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट गंजल्याची माहिती समोर आली होती. याबाबत सार्वजनिक विभागाने नौदल विभागाला कळवले होते. परंतु, नौदलाकडून त्यानंतर कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत.

error: Content is protected !!