NCP : एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या दाव्या नंतर अजित पवार काय उत्तर देणार? हे आता पाहावे लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांना प्रश्न करून त्यावेळी कुणाला मुख्यमंत्री करायचं नव्हतं हे स्पष्ट करावे असे आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यात त्यांनी धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना 1999 मध्ये केली. पाच वर्षानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला असता, असा आरोप अजित पवार सातत्याने करत आहेत. अजित पवार यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी उत्तर दिले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या दाव्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके कारण काय ?
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, त्यावेळी सुप्रिया सुळे राजकारणात नव्हत्या म्हणून कुणी पात्र नव्हतं का असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. 2004 ला राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त जागा राज्यात निवडून आल्या. मात्र, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोणाला करायचं नव्हतंच तर कुणी मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हतं असं कसं म्हणू शकता, असेही मिटकरी म्हणाले. 2004 साली राष्ट्रवादीत अनेक जण मुख्यमंत्रीपदासाठी पात्र होते. मात्र, त्यावेळी उमेदवार नव्हता की कुणाला मुख्यमंत्री करायचं नव्हतं हे शरद पवार यांनी स्पष्ट करावे असं आवाहन मिटकरींनी केले आहे.
तर दुसरीकडे त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण नावाचे मुख्यमंत्री लादल्या गेले असा आरोपही त्यांनी केला. मात्र, तरीही पवार यांनी विरोध केला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या वेळीही उध्दव ठाकरे यांना अनुभव नसतानाही मुख्यमंत्री करण्यात आले. शरद पवार यांनी उपस्थित मुद्दे स्पष्ट करावे असे म्हटले आहे.