महाराष्ट्र

Amol Mitkari : वडेट्टीवार म्हणाले, ‘बेटा अजित कितना खाया’!

Vijay Wadettiwar : दादांच्या आमदारांचेही शोले स्टाईल उत्तर

Congress Vs NCP : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसेतसे राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. शोले चित्रपटातील प्रत्येक डॉयलॉग जनतेच्या ओठांवर आहेत. आता हेच डॉयलॉग राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. आरोप-प्रत्यारोपांसाठी वापरण्यात येणाऱ्या डॉयलॉगवरून जनतेचं मात्र चांगलं मनोरंजन होत आहे. 

शोले चित्रपटातील डॉयलॉग म्हणून अजित पवार यांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खिल्ली उडवली. तर याला उत्तर देताना अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनीही ‘शोले’च्या डायलॉगचा आधार घेतला. आणि वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केला. विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या चांदवड येथील सभेत ‘बेटा अजित कितना खाया, सरदार ७० हजार कोटी.. बहुत खाया..ये ले तिजोरी की चाबी रख…’ या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. त्याला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनीही शोलेच्या डॉयलॉगचा आधार घेतला. अमोल मिटकरींनीही ‘अरे ओ सांबा’ म्हणत वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले.

वडेट्टीवारांचे आरोप

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच राजकीय रंग चांगलेच चढले आहेत. राज्यात सध्या प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. लाडकी बहीण म्हणतात मात्र लाडक्या बहिणीवर सर्वाधिक अत्याचार या महाराष्ट्रात सुरू असल्याचेही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार हे नाशिकच्या चांदवड येथील माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित शेतकरीमेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ही जोरदार टीका केली.

मिटकरी काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते अमोल मिटकरींकडूनही वडेट्टीवार यांच्यावर शोले’स्टाईल’ पलटवार करण्यात आला. विरोधी पक्ष नेत्याच्या डोक्यात ‘शोलेचा गब्बर’ घुसला अशा शब्दात त्यांनी उत्तर दिलं. मिटकरी म्हणाले, ‘क्यों रें सांभा… चंद्रपूर में दारू बंद करने के लिए कितने खाये. और कितने आदमी थे’, असा डायलॉग अमोल मिटकरी यांनी वडेट्टीवारांना मारला. वडेट्टीवारांनी तोंड आवारावं असा इशाराही मिटकरींनी दिला.

जनतेचे मात्र मनोरंजन!

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वी राजकीय नेत्यांमध्ये राजकीय रंग चढला आहे. एकमेकांवर टीका करताना वेगवेगळ्या खोचक शब्दांचा वापर करत टीका करण्यात येत आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तोंड सुख घेताना दिसतील मात्र यातून जनतेचे चांगलंच मनोरंजन होणार आहे.

error: Content is protected !!