महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : भ्रष्टाचारामुळे महाराजांचा पुतळा कोसळला

Protest : शरद पवारांचा हल्लाबोल; मविआचे ‘सरकारला जोडे मारो’ आंदोलन

Jode Maro Andolan : मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. ‘गेट वे ऑफ इंडिया’समोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे. राज्यात अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. 

महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढला. आणि ‘सरकारला जोडे मारो’ आंदोलन केले. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे. ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन होते, असेही पवार म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, खासदार छत्रपती शाहू महाराज आदींची उपस्थिती होती. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मोर्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

नाना पटोले म्हणाले, ‘भाजप सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला. महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहेत. खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही. महाराजांच्या नावाने मते मागायची आणि नंतर अपमान करायचा, ही भाजपची पेशवाई वृत्ती आहे.’

खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, ज्यांनी हे केले त्यांना माफी नाही. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे, त्याप्रमाणे आपली पावले पडली पाहिजेत.’

Akola West : शर्मा, ओळंबे, अलीमचंदानी ओके; अग्रवाल, हातवळणे नको

आऊट अॉफ इंडिया करा – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मगरुरी होती. अशी माफी मान्य नाही. पुतळा पडला म्हणून माफी मागितली, की भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली. की भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली? महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका.’

error: Content is protected !!