Maharashtra Politics : लोकसभेचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का दिला आहे. त्यात अजित पवारांच्या वाट्याला केवळ 1 जागाच आली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाल्याची महिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील दोन ते तीन आमदार आमच्याच संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलं यश या निवडणुकीत मिळालं आहे.
पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच लढलेल्या दोन्ही राष्ट्रवादींतील शरद पवार यांच्या गटाला 10 पैकी 8 जागा मिळाल्या. तर अजित पवार यांच्या गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान या निकालानंतर (ता. 6) रोजी अजित पवारांनी त्यांच्या आमदारांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला त्यांच्या 5 आमदारांनी दांडी मारल्याची माहित समोर आली. त्यामुळे अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आमदारांच्या गैरहजेरीवरून विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. तर अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया देत वेगळाच दावा केला आहे. मिटकरी म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर होणार आहे. मतदारसंघातील कामे पुर्ण व्हावी, याकरीता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) तीन आमदारांनी काल बैठक आटोपल्यानंतर संपर्क केला. हवेत गोळीबार करणाऱ्या तुतारी गटाच्या नेत्याला लवकरच गुड न्यूज मिळेल, असेही मिटकरी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले मिटकरी?
निवडणूक निकालानंतर राजकरण चांगलंच तापलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली आहे. मिटकरी म्हणाले, लोकसभेच्या निकालानंतर हवेत गोळीबार करण्याचा सातत्याने प्रकार दुसऱ्या गटाकडून होत आहे. त्यांच्या आमदार संपर्काबाबतच्या बाष्कळ बोलण्याला अर्थ नाही. मी स्वतः हॉटेल ट्रायडंट मधील बैठकीचा साक्षीदार आहे.