Politics Over Reservation : मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं वाक्युद्ध सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतो म्हणून बार्शीत एका तरुणाला आमदार राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे. यावरून मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झडत आहेत. आता पुन्हा राऊत यांनी आंदोलन स्थळावरून जरांगेवर थेट निशाणा साधला आहे. टोमणे मारायचं बंद करा. राजकारण थांबवा. नौटंकी करू नका, अशा शब्दात नाव न घेता त्यांनी इशारा दिला आहे.
ठिय्या आंदोलन
मनोज जरांगे पाटील 16 सप्टेंबरपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत. राजेंद्र राऊत यांनीही बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे राजेंद्र राऊत यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचीच मागणी केली आहे. त्यामुळे एकाच मागणीसाठी दोन आंदोलने होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांना हात जोडून आवाहन केले आहे. राऊत म्हणाले, तुम्ही असले टोमण मारायचं बंद करा. गेल्या वर्षभरापासून समाजाबाबत सुरू असलेले राजकारण थांबवा. नौटंकी करू नका.
नाव घेणे टाळले
आमदार राऊत यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला. सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या. विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करा. बाकी काहीही बोलू नका, असेही राऊत म्हणाले. राजेंद्र राऊत म्हणाले की, येत्या 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे 20 दिवस हातात आहेत. सरकारला विशेष अधिवेशन बोलविण्यास भाग पाडावे, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे. विशेष अधिवेशन बोलविण्याबाबत भूमिका काय? यावर राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांना प्रश्न केला.
Manoj Jarange Patil : जरांगेंना द्यावी लागतील ‘या’ 11 प्रश्नाची उत्तरे !
भूमिका स्पष्ट करावी
काही लोक महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे पाप करीत आहेत. त्यामुळे या विषयात स्पष्टता यावी. भाजपला आवाहन आहे. भाजपने ओबीसीतून (OBC) आरक्षणाबाबतची भूमिका काय ते स्पष्ट करावे. आमदाराने भूमिका स्पष्ट करावी अशी विचारणा होत आहे. आपली भूमिका स्पष्ट आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी आपली ठाम मागणी आहे, असे राऊत म्हणाले. मराठा बांधवांनी राजकारणात फसायचे की कोणाची नौटंकी ऐकून घ्यायची हे ठरावावे. आता योग्य वेळ आली आहे. सरकार आणि विरोधी पक्षाकडून मराठा आरक्षण विषयाला वेगळी बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.