Submission Of Report : कमकुवत फ्रेमचा वापर, चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले वेल्डिंगचे काम आणि गंज चढल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. याबाबतचा स्पष्ट अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील हे प्रकरण त्यामुळे चांगलेच तापणार आहे. गेल्या महिन्यात हा पुतळा कोसळला होता. याप्रकरणी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने आपला 16 पानी अहवाल सरकारला सादर केला आहे.
गंज चढल्याचा दावा
अहवालात पुतळा कमकुवत फ्रेम आणि पुतळ्यात गंज चढल्यामुळे कोसळल्याचा दावा केला आहे. भारतीय नौदलाचा (Indian Navy) 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा हे या समितीचे अध्यक्ष होते. समितीत पाच सदस्यांचा समावेश होता. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. पुतळ्यातील गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंग कामामुळे हा पुतळा कोसळल्याचे, या अहवालात म्हटले आहे.
आठ महिन्यांनी घटना
मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. लोकार्पणानंतर अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांसह शिवप्रेमींचीदेखील माफी मागितली. पोलिसांनी या प्रकरणाचा बांधकाम पाहणाऱ्या चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे अटक केली. आता या कामाचा चौकशी अहवाल पुढे आल्याने मोठा राजकीय भूकंप होणार आहे.
पुन्हा काम ..
राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कणवलीच्या (Kankavli) सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता कार्यालयाने ही निविदा मागवली आहे. काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची ही निविदा प्रसिद्ध झाली आहे. मात्र पहिला पुतळा कोसळल्याने सुरू झालेले राजकारण आता अहवाल आल्यानंतर आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.