Police Encounter : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलीसांनी एन्काउंटर केले. याप्रकरणात आरोपीचे काँग्रेसने समर्थन केलेले नाही. मात्र या एन्काऊंटवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजे. सरकार उत्तरे न देता विरोधकांवरच प्रश्न उपस्थित करत आहे. भाजपा सरकार पापी व खोटारडे आहे. स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलत आहे. अक्षय शिंदे सारखेच बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काऊंटर करा. विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
गंभीर आरोप
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी अनेक गंभीर आरोप केले. बदलापूरच्या शाळेत लहान मुलींचे पोर्न व्हीडिओ बनवले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. वादग्रस्त शाळा भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ( RSS) आहे. शाळेतील कृत्ये लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. साध्या पाकीटमारालाही पोलिस हातकडी बांधून घेऊन जातात. अक्षय शिंदेला हातकड्या घातल्या नव्हत्या का, असा प्रश्न त्यांनी केला.
पोलिसांचा हलगर्जीपणा?
ज्या पोलिसाची रिव्हॉलव्हर अक्षय शिंदेने घेतली, ती लॉक नव्हती का, नाना पटोले म्हणाले. बदलापूर प्रकरणातील बाकीचे आरोपी अजून का पकडले गेले नाहीत, हे प्रश्न उपस्थित होतात. जे लोक या प्रकरणात आहेत, त्या सर्वांना अक्षय शिंदे सारखीच शिक्षा द्यावी. बदलापुरातच अशी घटना घडली, असे नाही. गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही (Nagpur) अलिकडच्या काळात यापेक्षा भयानक घटना घडली आहे. राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे, असे नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातील लोकांच्या मनात महायुतीबद्दल (Mahayuti) प्रचंड राग आहे. त्यामुळे आपले कृत्य लपवण्यासाठी सरकारकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणीही पाठीशी घालू शकत नाही. परंतु तुझ्या शाळेची घटना घडली, त्या शाळेतील खऱ्या आरोपींना शोधून काढण्याची आव्हान सरकारने स्वीकारले पाहिजे. शाळेच्या संचालकांना किंवा खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी तर हे एन्काऊंटर करण्यात आले नाही ना, असा संशयही नाना पटोले यांनी व्यक्त केला.
संवेदनशील काँग्रेस
महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर काँग्रेस अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे अक्षय शिंदे यांच्यासारख्या आरोपीचे समर्थन काँग्रेस करणार नाही. काँग्रेसला पोलिसांवर देखील कोणताही संशय नाही. परंतु ज्या पद्धतीने घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब केला, तो आजही संशयास्पद आहे. शाळेचे संचालक मंडळ पोलिसांना सापडत नाही हे देखील अनाकलनीय आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यापासून तर अक्षयच्या एन्काऊंटर पर्यंत या प्रकरणामागे भलतेच काही आहे काय, याचा उलगडा झालाच पाहिजे अशी मागणी नाना पटोले यांनी केली. घटना घडली तेव्हापासून तर अक्षयच्या एन्काऊंटर पर्यंत सगळ्याच विषयाची नि: पक्ष चौकशी झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.