Hunger Strike : गोंदिया जिल्हाच्या सालेकसा तालुकातील धानोली आणि परिसरातील सहा गावांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अद्यापही रस्ता नाही. गेल्या 45 वर्षांपासून स्थिती जेसे थे आहे. आंदोलने करून, निवेदन देवून प्रशासनाला कळविण्यात आले. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी गेल्या पाच दिवसांपासून धानोली आणि इतर गावांतील नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
चुलबंद तर ..प्रशासन कुठे?
धानोली येथील नागरिकांनी सोमवारपासून (ता. 1) पासून चूल बंद आंदोलन सुरू केले. मात्र, अद्यापही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, नागरिकांत प्रचंड रोष आहे. धानोली-बाम्हणी हा जोडरस्ता या क्षेत्रातील लोकांकरिता महत्त्वपूर्ण आहे. धानोली, बाम्हणी, दरबडा, बोदलबोडी, नानव्हा, गिरोला, घोन्सी, पिपरटोला, भजेपार येथील नागरीकांना आरोग्य सेवा, शिक्षण, कृषिमालाची विक्री, बाजारपेठ, सरकारी कामे, आदींकरीता आमगाव, गोंदिया येथे येणे-जाणे करावे लागते.
धानोली ते बाम्हणी हा 4 किलोमीटर अंतराचा रस्ता त्याकरीता महत्वाचा आहे. मात्र, क्षेत्रातील लोकांना व विद्यार्थ्यांना 25 किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. वेळ आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊनसुद्धा रस्ता तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले. नाईलाजाने परिसरातील लोकांनी एकत्र येऊन उपोषण आंदोलन सुरू केले.
10 ऑगस्ट रोजी धानोली गावात सभा घेतली होती. सभेत सर्वानुमते आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 28 ऑगस्टपर्यंत रस्ता बांधकामाची स्थिती कळवावी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांनी गुरुवारपासून (ता. 5) आमरण उपोषण सुरू केले आहे. शामू मेश्राम, राहुल बघेले, अक्षय डोंगरे, होमेंद्र कटरे, जितेंद्र टेंभरे यांच्यासह इतरांनी उपोषण सुरू केले.
Agitation for Road : अख्खं गाव बसलं उपोषणाला, एकाही घरी चूल पेटली नाही
भेट पण उपाय काय
रविवारी (ता. 8) शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. वर्षानुवर्षे रडखडलेल्या कामाची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली. उपोषणकर्त्यांना काही दिवसांचा वेळ त्यांनी मागितला. याची जवाबदारी मी घेतो, असे त्यांनी सांगितले. युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुनसिंग बैस, जिल्हा समन्वयक डॉ. हिरालाल साठवणे, सालेकसा तालुका अध्यक्ष विजय नागपुरे, युवासेना तालुका प्रमुख मायकल मेश्राम, युवासेना शहर प्रमुख बाजीराव तरोने, आमगाव शहर प्रमुख अतूल चौहान, फुलीचंद चींधालोरे व शिवसेना कार्यकर्ते यावेळी त्यांच्यासोबत होते. धानोली येथील नागरिकांनी सोमवारपासून चूल बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे आता आंदोलनाला धार आली आहे.