देश / विदेश

BJP News : उच्चस्तरीय बैठक; फडणवीस, मुनगंटीवार, बावनकुळे दिल्लीत दाखल

Lok Sabha Result : लोकसभेच्या निकालावर होणार प्रदीर्घ विचारमंथन

National Politics : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. झालेल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात तातडीने आज मंगळवारी (ता. 17) राजधानी नवी दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक होत आहे. महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता ही बैठक होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या त्रुटी राहून गेल्या, यावर या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, समीकरण यावरही विचार होणार आहे.

बदल शक्य

लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएला बहुमत मिळाले. मात्र भारतीय जनता पार्टीच्या जागांमध्ये घट झाली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामध्ये भाजपला अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. त्याचा मोठा परिणाम भाजपवर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला. मात्र केंद्रीय नेत्यांनी त्यांना सरकारमध्ये कायम राहण्याची सूचना केली. मंगळवारी होणाऱ्या भाजपच्या या बैठकीत सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ भाजप नेते असतील. सुधीर मुनगंटीवार यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आमदार, प्रदेशाध्यक्ष, अर्थमंत्री आणि आता वनमंत्री असा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळेच ज्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Congress News : कार्यकर्त्याने धुतले नानांचे चिखलाचे पाय!

विदर्भातील हेवीवेट त्रिमूर्ती

भाजपला विदर्भात केवळ दोनच जागांवर विजय मिळवता आला. दिल्लीतील बैठकीत विदर्भातील तीन नेते सहभागी होत आहेत. फडणवीस, मुनगंटीवार आणि बावनकुळे हे ते तीन नेते आहेत. त्यामुळे सहाजिकच भाजपच्या या बैठकीत विदर्भावर जोर दिला जाईल यात दुमत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने ‘रोडमॅप’ही ठरवला जाऊ शकतो. भाजपच्या संघटनात्मक रचनेमध्ये फेरबदल होईल, असेही सांगण्यात येत आहे. त्यातून कोणाला काही नवीन जबाबदारी मिळते का? यावर सर्वांचे लक्ष आहे.

काँग्रेसला रोखणे गरजेचे

विदर्भात भाजप समोर सर्वात मोठे आव्हान आहे काँग्रेसला रोखण्याचे. काँग्रेसचे असे कोणते मुद्दे प्रचारात लोकांनी विचारात घेतले याची चर्चाही त्यामुळे होणार आहे. ही बैठक झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची आहेच. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

error: Content is protected !!