Assembly Election : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या विधानाबद्दल गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बुलढाण्यातील कार्यक्रमात खडेबोल सुनावले. ‘वाचाळवीर’ म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच संजय गायकवाड यांचे नाव न घेता कान टोचले.
वादग्रस्त विधान
राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यानंतर मोठा वाद उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यात आंदोलने सुरु आहेत. दरम्यान आमदार गायकवाड यांच्या विरोधात बुलढाण्यात गुन्हा देखील दाखल झाला. ही घटना ताजी असतानाच महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी कुणाला इशारा दिला, हे लोकांनाही सहज लक्षात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबत बुलढाण्यात होते. लाडकी बहीण कार्यक्रमासह बुलडाणा शहरातील पुतळ्यांच्या लोकार्पणासाठी ते आले होते. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार आपल्याला दिला आहे. सत्ताधारी, विरोधी व कुठलाही पक्ष असो वाचाळवीरांनी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मर्यादा पाळल्याच पाहिजे. कुठेही वेडे वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना किंवा घटक पक्षांना अडचणीत आणू नये!’
राग व्यक्त करण्याची भाषा कशी असली पाहिजे याचाही त्यांनी दाखला दिला. ते म्हणाले, ‘भाषा अशी वापरली पाहिजे की उद्या कुणी टीका करायला नको. सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा कसा असायला हवा, हे यशवंतराव चव्हाण यांनी शिकविले आहे. महायुतीचे सरकार त्याच विचारांचे आहे, असेही पवार म्हणाले.
Buldhana : लाडक्या बहीणीने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे!
अजित पवार काय बोलले?
आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, ‘मी एक गोष्ट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेन. वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना आणि महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नका. राग येतो हे बरोबर आहे. आम्हालाही येतो. पण, राग व्यक्त करताना काही मर्यादा असतात. राग व्यक्त करण्यासाठी कुठली भाषा वापरली जाते हेही महत्त्वाचे आहे.’